"स्वार्थत्याग" हा गुण महान राष्ट्राच्या नागरिकाच्या अंगी असावा लागतो.
कधीतरी मी स्वत:ला हा प्रश्न विचारतो कि भारतीय नागरिकांच्या अंगी हा गुण आहे का? फार काथ्याकुट केल्यावर मला उत्तर मिळते "नाही",आजूबाजूला पाहिलं तर माझ्या या वाक्यातील सत्यांश आपल्या ध्यानी येईल.भ्रष्टाचाराविरुद्ध कितीही बोंबाबोंब केली तरी सिग्नलवर १०० रुपयांचा दंड भरण्या ऐवजी आपण पोलिसाला "साहेब ५० मध्ये अडजस्ट करा कि " म्हणून खुली ऑफर देतो. आपण ५० रुपयांच्या फायद्यासाठी व्यवस्था भ्रष्ट करतो मग खरच आपणास भ्रष्टाचाराविरुद्ध बोलण्याचा अधिकार पोचतो का?
आपल्या इथे एखादा गरीब आणि स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार निवडणूक जिंकल्याची उदाहरणे किती आहेत? अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच उदाहरणे सापडतील.आज जे देशात माजलय त्यानंतरही कॉंग्रेस परत जिंकून येऊ शकते याच कारण मते देताना आपण आपली तत्वे,विचार आणि सारासार विचारशक्ती बासनात बांधून ठेवलेली असते.आणि एकदा का मतदान करून बाहेर पडलो कि मग मोठमोठी तत्वज्ञान सुचू लागतात,
“देवा पांडुरंगा या देशाला वाचीव र बाबा”